अमळनेर (प्रतिनिधी) येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनसाठी गठित सर्व समित्यांची समन्वय बैठक प्रताप तत्वज्ञान मंदिरात पार पडली. सांघिक काम करुन संमेलन यशस्वी करुन दाखविण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. तीन टप्प्यात झाली बैठक.
मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेरचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला व्यासपीठावर म.वा मंडळाचे उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह नरेंद्र निकुंभ, शरद सोनवणे, म.वा मंडळाचे संचालक बजरंग अग्रवाल, माजी मंत्री विजय नवल पाटील, ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, हर्षल पाटील उपस्थित होते. प्रास्ताविकात प्रा.डॉ.सुरेश माहेश्वरी यांनी संमेलनाच्या तयारीचा आढावा मांडला. त्यानंतर भैय्यासाहेब मगर यांनी विविध समित्या व त्यांच्या प्रमुखांच्या नावाचे वाचन केले. सूत्रसंचालन संदिप घोरपडे तर आभार प्रदर्शन स्नेहा एकतारे यांनी केले. यावेळी विविध समित्यांचे प्रमुख व सदस्य उपस्थित होते.
तीन टप्प्यात झालेल्या या बैठकीच्या पहिल्या सत्रात सर्व समित्यांची एकत्रित बैठक घेवून म.वा.मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात समितीनुरुप बैठका झाल्या. त्यात सदस्यांना कामांचे स्वरुप समजविण्यात आले. तिसऱ्या सत्रात पुन्हा एकत्र बैठक घेवून सांघिक काम करुन मेळावा यशस्वी करुन दाखविण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. समिती प्रमुखात प्रा.डॉ.कुणाल पवार, भाऊसाहेब देशमुख, बी.एन.चौधरी यांनी आपली मते मांडली. बैठकीला म.वा मंडळाचे कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, सदस्य प्रा. डॉ. पी. बी. भराटे, बन्सीलाल भागवत, वसुंधरा लांडगे, प्रा.श्याम पवार, प्रा. शीला पाटील, अजय केले, हेमंत बाळापूरे आदी उपस्थित होते.