दोघांनी अर्धनग्नावस्थेत मोर्चाला लावली हजेरी
अमळनेर (प्रतिनिधी) शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळात तालुक्याला डावल्याने तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा आणि पीक विम्याची अग्रीम रक्कम मिळाली नाही म्हणून तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस , काँग्रेस व शेतकऱ्यांनी प्रांत कचेरीवर मोर्चा काढला. यात दोघांनी अर्धनग्नावस्थेत मोर्चाला हजेरी लावली.शासनाने दुष्काळग्रस्त यादी दुरुस्त करून अमळनेर तालुक्याचा समावेश करावा म्हणून महाविकास आघाडीतर्फे महाराणा प्रताप चौकातून प्रांत कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. प्रांताधिकारी महादेव खेडकर याना निवेदन देऊन जर तालुका दुष्काळी जाहीर झाला नाही तर २० नोव्हेंबर पासून धरणे आंदोलन करण्यात येईल व त्यांनंतर २७ नोव्हेंबर पासून आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला. मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील ,काँग्रेस चे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे , शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय पाटील , रा कॉ च्या प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील , महिला काँग्रेस च्या जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ , अनंत निकम , किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील , कार्यध्यक्ष प्रा सुभाष पाटील , खान्देश शिक्षण मंडळाचे चेअरमन डॉ अनिल शिंदे , प्रवीण जैन ,बी के सूर्यवंशी , घनश्याम पाटील, तुषार संदानशीव , सनी गायकवाड , दिलीप पाटील ,प्रताप पाटील ,नीलकंठ पाटील , सचिन वाघ ,हर्षल जाधव , सुशील पाटील ,डॉ महेश ठाकरे , धनगर पाटील , डॉ किरण पाटील , मुशीर शेख , राजेंद्र देशमुख , शांताराम पाटील ,प्रवीण पाटील ,मनोहर पाटील ,ललित पाटील , अनिरुद्ध शिसोदे ,दीपक शिसोदे ,प्रवीण देशमुख ,मयूर पाटील ,ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह काही शेतकरी सहभागी झाले होते.
मंत्री अनिल पाटील यांच्यावर केली जोरदार टीका
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील व सेनेचे अनंत निकम हे निषेध म्हणून डोक्याला काळे फडके बांधून अर्धनग्न अवस्थेत मोर्चाचे नेतृत्व करत होते. सचिन पाटील यांनी मंत्री अनिल पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. मंत्री आणि अधिकारी शेतकरी पुत्र असल्याचे सांगतात. मात्र हे सत्तेत असूनही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडतात. तालुका दुष्काळी जाहीर झाला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी मारवड येथील शेतकरी दिलीप पाटील यांनी मंत्री अनिल पाटील यांनी अर्वाच्य भाषा वापरून शेतकऱ्याला हिणवल्याचा आरोप केला. यावेळी सरकार व मंत्र्यांविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली.
२१ दिवसांपेक्षा जास्त दिवसांचा पावसाचा खंड
अमळनेर तालुक्यात आठही मंडळात २१ दिवसांपेक्षा जास्त दिवसांचा पावसाचा खंड पडला. यामुळे संपूर्ण तालुक्यात कापूस ,उडीद ,मुग ,ज्वारी ,बाजरी , भुईमूग यांचे उत्पन्न ३० टक्के पेक्षा कमी कमी आले आहे. तालुक्याची पैसेवारी देखील ५० पेक्षा कमी जाहीर झाली आहे. तरी देखील अमळनेर तालुक्याचा दुष्काळी तालुका म्हणून यादीत समावेश झालेला नाही.