गावभर पूजन ,हंगाम चांगला येऊ दे म्हणत घातले साकडे
अमळनेर (प्रतिनिधी) श्रावण महिन्यातील पहिला सोमवार म्हणजे कानबाई मातेचा रोट उत्सव पाडळसरे येथे उत्साहात साजरा करण्यात आला. सलग तीन दिवस गावात कामानिमित्त बाहेर गावी ,पर राज्यात गेलेले भाऊबंदकितील लोक परिवारासह गावात दाखल झाले व गावात जत्रेचेच स्वरूप प्राप्त झाले होते.
तरुण पिढीला आदर्शवत असलेल्या व नवं विवाहित दाम्पत्याला कुलाचार धर्म पाळून करावयाची पूजा विधी लक्षात राहावी यासाठी राजेंद्र दत्तात्रय पाटील ,भरत रोहिदास पाटील व विजय राजाराम पाटील यांच्या कुटुंबियांनी आपल्या घरी शनिवारी विधिवत कानबाईची स्थापना करून ग्रामदैवत मरीआईच्या मंदिरात कुटुंबातील कर्त्या महिलांच्या मार्गदर्शनाने नैवेद्य दाखवून रोट पूजन सुरुवात केली. रविवारी दुपारी कानबाई मातेची कौटुंबिक जोडप्याच्या मदतीने विधिवत पूजा करून झाल्यावर जोडपीच्या जोडपी कानबाई पुजनासाठी रांगा लावून दर्शन घेत निघत होत्या. काल रात्रभर होऊन कानबाई जवळ प्रत्येक भाऊबंदकितील महिला व पुरुषांनी गाऊन संगीत तालावर नाचगाने करून जागरण केले. सोमवारी सकाळीच ८ वाजे पासुन कानबाई विसर्जन करण्यात आले.
पुनर्वसन गावातील मिरवणूक जवळपास पांच तास चालली , जुन्या पाडळसरे गावात गेल्यावर ग्राम दैवत अंबिका मातेच्या मंदिरात गावातील सर्व कानबाईचे एकत्रीत सामुहिक पुजन व आरती होऊन पुन्हा जुन्या गावभर मिरवणूक तापी नदी काठावरील नाटेश्वर महादेवा समोर कानबाईला विश्रांती देऊन नदी तीरावर उपस्थित सर्व गावकर्यांनी आरती करून तापी नदीच्या पाण्याच्या प्रवाहात कानबाई मातेला तापी तीर्थ दाखवून मोठ्या मनाने “कानबाई माता कि जय” म्हणत विसर्जन करण्यात आले. यावेळेस महिला वर्ग भावविवश झालेल्या दिसल्या.