त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) आधीच पावसाची हुलकावणी आणि त्यात तालुक्यातील जानवे, डांगर व रणाईचे परिसरात कपाशीवर लाल्या व मर रोग पडू लागल्याने काही शेतकऱ्यांनी कपाशी उपटून फेकून दिली आहे. यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत आहेत. तर गेल्या वर्षी भाव नसल्याने शेतकऱ्यांचा कापूस घरात पडलेला आहे , पाऊस पडत नाही , ज्यांनी बागायती कापूस लावला ,रोपे उगली मात्र लागलीच लाल्या आणि मर रोग पडू लागल्याने आज एक रोप सूकते दुसऱ्या दिवशी प्रमाण वाढते तिसऱ्या दिवशी शेकडो रोपे जळत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. जानवे येथील प्रकाश विक्रम पाटील यांनी आपली रोपे उपटून फेकली आहेत. बियाणे आणि खते यांचा खर्च वाया गेला आहे. हीच परिस्थिती जानवे व रणाईचे परिसरात इतर शेतकऱ्यांची झाली आहे. किसान काँग्रेस चे तालुकाध्यक्ष प्रा. सुभाष पाटील , कृष्णा पाटील , कमलेश शांताराम पाटील , सरपंच सरला प्रकाश पाटील ,गोपाल पाटील यांनी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा , तालुका कृषी अधिकारी भारत वारे याना निवेदन देऊन १ जून रोजी लागवड केलेल्या कापसावर लाल्या रोग पडू लागल्याने पिके जळत आहेत. तरी शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.
पाहणी करून केली विडिओ रेकॉर्डिंग
शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ठाकूर, सहाय्यक कृषी अधिकारी किरण पाटील ,सहाय्यक कृषी अधिकारी सोनवणे यांनी जानवे येथे जाऊन विविध शेतात जाऊन कपाशीच्या पिकांची पाहणी केली व बियाणे वितरक संजय पाटील यांना व्हिडीओ वरून परिस्थिती दाखवली.