अमळनेर– ‘चळवळ’ ही व्यापक संज्ञा आहे. चळवळ म्हणजे फार मोठी गोष्ट नसून दिलेलं किंवा स्वीकारलेले काम जबाबदारीने व प्रमाणिकपणे पार पाडणे होय. देशाला पुढे नेण्यासाठी दिलेलं काम प्रामाणिकपणे करा म्हणजे आपोआप देश विकसित होईल. प्रत्येक काम ही देश सेवाच असते.जन्म सार्थकी लावण्यासाठी काहीतरी करून दाखवा, असे मत अप्पर आयकर आयुक्त संदीप कुमार साळुंखे (औरंगाबाद) यांनी आज व्यक्त केले. सानेगुरुजी शैक्षणिक विचारमंच व शिवशाही फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय प्रेरणादीप व्याख्यान मालेत ‘शैक्षणिक-सामाजिक चळवळ काळाची गरज’ या विषयावर पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते.
माजी आमदार साहेबराव पाटील अध्यक्षस्थानी होते. गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे प्रमुख पाहुणे होते. श्री. साळुंखे पुढे म्हणाले की,अपेक्षा ठेवल्या की दुःख येतं आणि म्हणून निस्पृह भावनेने काम करा.कर्मफलत्याग करा.एखादी गोष्ट मिळवायची असेल तर स्वतःला झोकून द्या,कष्ट करा,यश नक्की मिळेल’.काही करावसं वाटत असेल तर,’पाणी व शिक्षण’या दोन गोष्टीसाठी काम करा.कारण येणारा काळ या दोन समस्या घेऊन च येणार आहे.असं द्रष्टेपण त्यांनी दाखवून आव्हान केलं.एखादा देश नष्ट करायचा असेल तर काहीच करू नका,फक्त त्या देशाचे प्राथमिक शिक्षण घालवा, वीस वर्षांत तो देश आपोआप नष्ट होईल म्हणून शिक्षण हे पिढी घडविण्याचे माध्यम आहे,चांगल्या शिक्षणांनी देश घडेल,म्हणून शिक्षकांनी मन लावून शिकवा. माझ्यासह काही अधिकाऱ्यांनी मराठवाड्यात 600 कोटीचे करसंकलन केले, हे संकलन देशाच्या विकास कामात हातभार लावणारे होते. तालुक्यात रूट संकल्पनेचे दृश्य स्वरूप मारवड व परिसरात तसेच अंबरीष टेकडी वर दिसून येत आहे. सद्यस्थितीत पांझरा- माळण नदी जोड प्रकल्पाची चळवळ सुरू झाली आहे. यात शासनाकडून हे काम झाले नाही तर आपण संपूर्ण देशात फिरून निधी जमा करून काम करण्याचा संकल्प करावा. युवकांनी विविध जातीचे, धर्माचे,पक्षाचे झेंडे खांद्यावर घेतले आहेत ही शोकांतिका आहे. या चक्रव्यूहातुन या युवकांनी बाहेर येऊन देशसेवेचा झेंडा हाती घेतल्यास देशाची सर्वांगीण प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. माजी आमदार पाटील म्हणाले की, शैक्षणिक व सामाजिक चळवळीतुन मोठा बदल होऊ शकतो, त्यातून देश घडत असतो.दत्तात्रय सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. चंद्रकांत पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. अशोक पाटील यांनी सूत्रसंचालन केले. मनोहर नेरकर यांनी आभार मानले.
आज व्याख्यान
तीन दिवसीय व्याख्यानमालेत आज (ता.११) सायं.६:३० ला येथील जी. एस्. हायस्कूलमध्ये शिंदखेडाचे तहसिलदार सुदामजी महाजन (शिंदखेडा) यांचे ‘करिअरच्या वाटा निवडतांना’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. खानदेश शिक्षण मंडळाचे व जी एस हायस्कुल चे चेअरमन प्रदीप अग्रवाल अध्यक्षस्थानी तर एन टी मुंदडे महाविद्याल यातील प्रा.संदीप पाटील, हे प्रमुख पाहुणे राहतील. व्याख्यानमालेला उपस्थित राहावे असे आवाहन सानेगुरुजी शैक्षणिक विचारमंच व शिवशाही फाऊंडेशन तर्फे करण्यात आले आहे.