खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

हजारोच्या गर्दीत खाकी वर्दी घालून बेडरपणे घुसणारा मी.. निरोप देण्याचे करतोय धाडस!

पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचा निरोप घेताना व्यक्त केल्या भावना

अमळनेर (प्रतिनिधी) कोणत्याही शासकीय सेवेत बदली हा प्रशासकीय भाग असल्याने अधिकारी येतात आणि जातात पण पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचा निरोप घेताना व्यक्त केलेल्या भावना आज प्रत्येकाच्या काळजाचा ठाव घेत आहेत.
पोलिस निरीक्षक हिरे यांची जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. त्यांनी आल्या सहकार्‍यांसोबत आलेले अनुभव त्यांच्याच शब्दात… माझ्या अमळनेर पोस्टेच्या सर्व सहकाऱ्याचे मनपुर्वक आभार मागील दिड वर्ष आपण मला जो पाठींबा दिला, जे सहकार्य केले त्यामुळे माझी प्रभारी अधिकारी म्हणून कारकीर्द यशस्वी झाली. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्ही मला जो सन्मान दिला तो मी कधीही विसरू शकणार नाही. माझ रागावणे, माझे आदेश, माझ्या सूचना, माझे सल्ले आपण सर्वांनी तंतोतंत पालन केले. पोलीस स्टेशन हे आपल कुटुंब आहे, असे समजून वैयक्तीक वाद वा हेवेदावे बाहेर जावू न देता माझ्यापर्यंत आणले. त्यानंतर मी दिलेला निर्णय अंतीम मानून तो विषय तिथेच संपवला. तुमच्या सर्वांच्या सर्वोकृष्ट कामगीरी मुळेच मला जळगाव जिल्हयात मीटिंगमध्ये वरिष्ठांकडून मान मिळत होता. तसेच अमळनेरच्या जनतेनेही म्हणुनच आपल्याला इतका सन्मान दिला. माझ्या कार्यकाळात माझ्या एकाही अंमलदाराला निलंबित वा मुख्यालय जमा व्हावं लागलं नाही ही माझ्यासाठी समाधानाची बाब आहे. अमळनेर पोस्टेचा माझ्याकडील प्रत्त्येक रत्न हा अनमोल होता. प्रत्येकात एक वेगळीच खुबी होती आणि तिचा मी पुरेपूर वापर केला. असे सहकारी मला एमआयडीसीला मिळतील का ? या प्रश्नाने मनात अनामिक भीती तयार होत आहे. पृथ्वी गोल आहे , त्यामुळे पुन्हा नक्की भेट होईल. पुढील १५ वर्षात कुठे ना कुठे सोबत नोकरी करण्याचा योग येईल. तुमचे नवीन प्रभारी हे माझे मित्र आहेत. चांगली टीम, चांगल पोलीस स्टेशन त्यांना मिळाल हा विश्वास मी आधीच त्यांना दिला आहे. माझ्यासाठी आपण जे काही ग्रुपवर टाकलत. त्यामुळे मलाही अश्रू अनावर होत आहेत. एवढे चांगले सहकारी उद्यापासून सोबत नसतील या जाणीवेतून रात्री ०२.३० वाजेपर्यंत झोप लागली नाही . सकाळी ठाणे अंमलदारच्या डिसीआर सांगण्याकरता आलेल्या फोनने उठणारा मी , आज पहाटे ०५.०० वाजेपासून जागा आहे … हजारोच्या गर्दीत खाकी वर्दी घालून बेडरपणे घुसणारा मी , आज तुमच्या डोळ्यात डोळे घालून निरोप देण्याच धाडस एकवटण्याचा प्रयत्न करत आहे …. या भावना लिहीतांनाही डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत आहेत . खुप खुप धन्यवाद याप्रेमाबद्दल ….आपलाच – जयपाल हिरे पो. नि.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button