अतिक्रमण काढतानाच नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांचा केला जाहीर सत्कार
अमळनेर (प्रतिनिधी) व्यापाऱ्याने उने पुरे तब्बल ४० वर्षे पत्र्याचे शेड लावून अडवून ठेवलेला मुख्य रस्ता नगरपालिकेने मोकळा केल्याने नागरिकांचा रस्त्यासाठीचा वनवास संपला आहे. मुख्याधिकाऱ्यांनी धडक कारवाई केल्याने नागरिकांनी त्यांचा जाहीर सत्कार करीत कृतज्ञता व्यक्त केली. तर अतिक्रमण हटवल्याने या रस्त्यानेही मोकळा श्वास घेतला.
शहरातील धुळे चोपडा राज्य मार्ग १५ पासून शहरातील पिंपळे रोड, ढेकू रोड, मार्गे शिंदखेडा बेटावद राज्य मार्ग सहाला जोडणारा मुख्य रस्ता व्यापाऱ्याने त्याच्या मालमत्तेच्या सुरक्षेसाठी गेल्या ४० वर्षांपासून बंद करून ठेवला होता. पावसाळ्यात कॉलन्यांमध्ये पाणी शिरत असल्याने इतर भागातून पाच धोकादायक वळणे घेत पाण्यातून जावे लागत होते. यात वाहनांची नासाडी होत होती. तसेच वाहतूक देखील खोळंबत होती. यापूर्वी अनेकदा मागणी करून निवेदने देऊन देखील रस्त्याबाबत तत्कालीन लोकप्रतिनिधी अथवा अधिकाऱ्यांनी कोणतीच कार्यवाही केली नव्हती. नगरसेवक विवेक पाटील, संजय पाटील यांच्यासह नागरिकांनी हा रस्ता पावसाळ्यापूर्वी मोकळा करण्याची मागणी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्याकडे केली. सरोदे यांनी तात्काळ दखल घेऊन नकाशामधील रस्त्याच्या शोध घेऊन व्यापाऱ्याला नोटीस दिली. व्यापाऱ्याने देखील सुरक्षेसाठी रस्ता अडवल्याचे कबुल केले. २४ रोजी सकाळी मुख्याधिकारी सरोदे यांच्यासह अभियंता अमोल भामरे , अभियंता नगररचनाकर विकास बिरारी, आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण, अरविंद कदम, अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल, विजय सपकाळे, योगेश पाटील यांच्यासह जेसीबी मशीन व इतर ताफा हजर झाला. रस्त्यातील कंपाऊंड, पत्र्याचे शेड, झोपड्या, झाडे, काटेरी बाभूळ काढून रस्ता काही तासात मोकळा केला. त्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त करत मुख्याधिकारी सरोदे यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. या वेळी दीपक चव्हाण, राहुल चौधरी, कैलास बोरसे, बाविस्कर, कुंदन पाटील, गोसावी, बी. ए. पाटील उपस्थित होते.