अमळनेर (प्रतिनिधी) – चप्पला, बुटांचा व्यवसाय करण्यासाठी एक लाखांची मागणी करून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती, सासू सासरे व जेठ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जयश्री ज्ञानेश्वर माळी (वय २५, रा.शिरूड ता.अमळनेर) या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २४ ऑक्टोबर २०१९ पासून मी वडिलांकडे शिरूड येथे राहत आहे. २ जून २०१६ रोजी ज्ञानेश्वर तापीराम माळी (रा.लासुर ता.चोपडा) यांच्या सोबत विवाह झाला होता. सार्थक नावाचा पाच वर्षांचा मुलगा आहे. लग्नानंतर आम्ही सासरे तापीराम पंडित माळी,सासू लक्ष्मीबाई तापीराम माळी,जेठ हरीश्वर तापीराम माळी व जेठाणी कविता हरीश्वर माळी यांच्यासह लासुर ता.चोपडा येथे एकत्र कुटुंब पद्धतीने राहत होतो. लग्न झाल्यानंतर साधारण चार ते पाच महिने सासरच्या मंडळींनी मला व्यवस्थित नांदविले. माहेरहून चपला बुटांचा व्यवसाय करण्यासाठी एक लाख रुपये घेऊन येण्यासाठी पती ज्ञानेश्वर माळी, सासरे, सासू, जेठ यांनी छळ सुरू केला. अश्याच मारहाणीत ८ डिसेंबर २०१६ रोजी गर्भपात झाला होता. त्यानंतर ३० ऑक्टोबर २०१७ ला सार्थक नावाचा मुलगा झाला. त्यानंतर २५ मार्च २०१८ रोजी पती ज्ञानेश्वर माळी बळजबरीने माहेरी शिरूड येथे सोडन्यास आले असता मला व माझ्या आई वडिलांना चापट्या बुक्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर ७ जानेवारी २०१९ रोजी वडिलांना सासरी लासूर येथे सोडण्यास बोलावून घेतले. त्यानंतर देखील सासरच्या मंडळींची पैशासाठी मारहाण व छळ सुरूच होता. अश्यातच २० ऑक्टोबर २०१९ रोजी मारहाणीमुळे दुसऱ्यांदा गर्भपात झाला.त्यामुळे सदरच्या जाचाला कंटाळून २४ ऑक्टोबर २०१९ पासून माहेरी शिरूड येथेच राहत आहे. याप्रकरणी जयश्री माळी हिने दिलेल्या फिर्यादी वरून पती ज्ञानेश्वर माळी, सासरा तापीराम माळी, सासू लक्ष्मी माळी, जेठ हरीश्वर माळी यांच्यावर भादंवि कलम ४९८(अ),३२३,५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक कैलास शिंदे करीत आहेत.