थकलेले भाडे आणि इमारत जीर्ण झाल्याचा कारणावरून विद्यार्थी, शिक्षक उघड्यावर
अमळनेर (प्रतिनिधी ) थकलेले भाडे आणि इमारत जीर्ण झाल्याचा कारणावरून जानवे येथील किसान विद्यालयाच्या इमारतीला ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी कुलूप ठोकल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न एरणीवर आला आहे.
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक या शिक्षण संस्थेच्या किसान विद्यालयासाठी १९७९ पासून जानवे ग्रामपंचायतीच्या मालकीची इमारत शाळेसाठी वापरण्यात येत होती. २००३ पासून इमारत २०२५ पर्यंत भाडे तत्वावर कराराने वापरण्यास दिली आहे, सध्या ती इमारत जीर्ण झाली असून ती वापरण्या योग्य नसल्याने सरपंच यांनी १९ जुलै रोजी सदर इमारत आठ दिवसात खाली करण्याबाबत नोटीस बजावली होती.
किसान विद्यालयात ५ ते १२ वि पर्यंतचे वर्ग असून ग्रामपंचायतीच्या सहा खोल्या शाळेला भाडे तत्वावर दिल्या आहेत. गावातीलच गरिबांचे सुमारे साडे तीनशे विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. ग्रामपंचायतीने या इमारतीला कुलूप ठोकले.
सुभाष भिला पाटील यांनी २०१३ पासून सदर शाळेची इमारत ही जीर्ण झाल्याची तक्रार ग्रामपंचायतीकडे केली होती. यापूर्वी देखील २०१७ मध्ये आर. बी. पवार मुख्याध्यापक असताना ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले होते. दरम्यान प्रकरण पोलीस स्टेशन मध्ये पोहचल्याने तेंव्हा पोलिसांनी मध्यस्थी करत कुलूप उघडले होते. त्यानंतर सुभाष पाटील यांनी जीर्ण इमारतीबाबत पाठपुरावा सुरूच ठेवला. आता पाटील यांनी सदर जीर्ण इमारतीत वर्ग भरवणे धोक्याचे असल्याचे प्रमाणपत्र बांधकामं विभागाकडून मिळवल्याने सरपंच विजय सोनवणे,मनोज पाटील, सुभाष पाटील आणि शरद पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतिने कुलूप ठोकले. शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक पी. एस. पाटील यांनी याबाबत आपण संस्था चालकांना कळवले असून माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांना देखील कळविले आहे, उद्या, प्रभारी मुख्याध्यापक आणि शिक्षक शिक्षणाधिकारी यांची आणि संस्था चालकांची भेट घेणार आहेत असे सांगितले. दरम्यान दरम्यान गटविकास अधिकारी एस बी सोनवणे यांनी याबाबत सखोल माहिती घेऊन उचित निर्णय घेतो असे सांगितले.
विद्यार्थ्यांना सोडले वार्यावर
ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांकडून भाडे ठरवले होते. त्यामुळे शाळा इमारत दुरुस्त करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची होती. मात्र ग्रामपंचायतीने गावातील मुलांच्या शिक्षणाचा विचार केला नाही आणि इमारतही दुरुस्त केली नाही.
त्यामुळे शाळा कुठे भरावयाची हा यक्षप्रश्न आता प्रभारी मुख्याध्यापक पी. एस. पाटील यांच्या पुढे निर्माण झाला आहे.
शिक्षणात अडथळ्याची शर्यत..
दरम्यान शाळेच्या इमारतीसाठी धुळे रस्त्यालगत एमएसइबीच्या सब स्टेशन जवळ साडे ३ एकर जागा उपलब्ध आहे. त्यावर शिक्षकांनी बांधकाम सुरू केले होते. मात्र शेजारील शेतकऱ्याने अडथळा आणल्याने बांधकाम अर्धवट पडून आहे.
थकित भाडे आणि जीर्ण इमारतीमुळे सुरक्षेच्या दृष्टीने इमारती केली खाली
ग्रामपंचायत मालकीची इमारत शाळेला दिली आहे. शाळेने इमारत भाडे भरलेले नाही. तसेच इमारत जीर्ण झाली असल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ती खाली करणे गरजेचे होते. म्हणून ती खाली करण्यात आली.
के. आर. देसले , ग्रामसेवक जानवे ता. अमळनेर