धुळे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आदेश
अमळनेर (प्रतिनिधी) कुटुंबासोबत पर्याटन करणाऱ्या कुटुंबाची बॅग हरवल्याने चौधरी यात्रा कंपनीने ग्राहकाला नुकसान भरपाई म्हणून १९ हजार रुपये देण्याचे आदेश धुळे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे. तसेच ही रक्कम ४५ दिवसाच्या आत ग्राहकाला द्यावी व तक्रार दाखल दिनांकापासून रक्कम फिटेपर्यंत दसादशे ९% दराने व्याजदराने रक्कम द्यावी असेही आदेशात म्हटले आहे.
अमळनेर येथील संजय मगनराव बडगुजर यांनी कुटुंबासोबत कुलूमनाली, शिमला, डलहौसी येथे गेले होते. २ जून रोजी शिमला येथून अंबाला येथे चौधरी यात्रा कंपनीच्या बस मधून जात असताना हॉटेल येण्यापूर्वी टूर मॅनेजर जेतराम चौधरी यांनी तुम्ही पुढे जा, तेथे बॅग आणून देतो असे सांगितते. मात्र बॅग आली नाही म्हणून विचारपूस केली असता उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यांनतर कंपनीशी पत्रव्यवहार करूनही समर्पक कार्यवाही झाली नाही म्हणून बडगुजर यांनी अखिल भारतीय ग्राहक मंचच्या अध्यक्षा अॅड. भारती अग्रवाल व अॅड. आर. बी. कुलकर्णी यांच्या मार्फत धुळे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगकडे अपील दाखल केली. यावर आयोगाने सुनावणी घेतली. दोन्ही बाजूने म्हणणे ऐकून घेतल्यानंतर झालेल्या ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष एस. पी. बोरवाल, सदस्य एस. एस. जोशी यांनी नुकसान भरपाई म्हणून चौधरी यात्रा कंपनीने १५ हजार रुपये, तक्रार अर्जाच्या खर्चापोटी २ हजार व मानसिक त्रासपोटी २ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश दिले आहेत.