अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाने अवघ्या २७ वर्षाच्या मुलाला गमावलेल्या आईवडिलांनी तिसऱ्याच दिवशी आपल्या मुलाच्या अस्थींचे विसर्जन न करता शेतात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. शिरूड येथील बिऱ्हाडे कुटुंबाने हा समाजापुढे नवा आदर्श घालून दिला आहे.
अमळनेर तालुक्यातील शिरूड येथील रहिवासी व धरणगावचे गटशिक्षणाधिकारी अशोक दामू बिऱ्हाडे व शिक्षिका रत्नप्रभा यांच्या २७ वर्षे वयाच्या कुणालने कोरोनाशी संघर्ष करताना आपला जीव गमावला. एकुलता एक तरुण मुलगा गमावल्याचे दुःख भयानक होते. आपला वंश जणू संपला याच्या वेदना मोठ्या होत्या. परंतु अशाही परिस्थितीत समाजसेवेचा वसा असलेले अशोक बिऱ्हाडे आणि त्यांच्या कुटुंबाने आपल्या मुलाच्या अस्थी नदीत विसर्जन करण्याच्या परंपरेला फाटा देऊन आपल्या शेतातील काळ्या मातीत अस्थींचे विसर्जन करून निसर्गातील वृक्षांचा वंश वाढावा म्हणून त्याठिकाणी आंबा आणि पिंपळ असे दोन वृक्ष लावले. प्रचंड दुःखाच्या सावटात असतांना देखील पर्यावरण संवर्धन करून समाजाला चांगला संदेश दिल्याबद्दल बिऱ्हाडे कुटुंबाचे सर्वत्र कौतुक होत असून नगरपालिकेच्या मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांनी या उपक्रमाचा समावेश माझी वसुंधरा अभियानात केला आहे.