अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे जिल्ह्यातील जळगाव , चाळीसगाव , चोपडा येथे जनता कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. त्यामुळे तेथील बाजार समित्या ही बंद करण्यात आल्या आहेत. म्हणून पर्यायाने अमळनेर बाजार समितीत शुक्रवारी वाहनाची मोठी गर्दी झाली होती. दिवसभरात सुमारे २५ हजार क्विंटल मालाची आवक आली. मात्र दुसरीकडे वाहनाची आणि लोकांची गर्दी झाल्याने कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
अमळनेर येथील बाजार समितीच्या समोरील रस्त्यावर सकाळपासूनच वाहनांची रांग लागली होती. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता, गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीत धुळे, जळगाव आणि नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यातून आवक होत आहे, मात्र अत्यंत बेशिस्त पद्धतीने बाजार समितीतून वाहनाची ये- जा सुरू असते, बाजार समितीच्या गेट जवळच रिकामे वाहने पार्किंग केली जातात, त्या वाहनधारकांना एकही कर्मचारी हटकत नाही, त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा होतो, येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनाचा मार्ग बदलला तर गर्दी कमी होऊन रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होऊ शकते.
बाजार समितीवर नियंत्रणचा उडतोय फज्जा
संचालक मंडळ किंवा अशास्कीय संचालक मंडळ नसल्याने बाजार समितीवर नियंत्रण नाही. फेब्रुवारी महिन्याचा पगार झालेला नाही , उच्च न्यायालयाच्या निकालाबाबत संभ्रम अद्याप दूर झालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे