प्रांताधिकारी सीमा अहिरेंनी दिला जनता कर्फ्यू लावण्याचा इशारा
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यात शुक्रवारी आलेल्या अहवालात पुन्हा ५५ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे रुग्ण संख्या दिविसेंदिवस वाढत असल्याने नागरिक नियमांचे पालन करीत नसल्यामुळे जनता कर्फ्यू लावण्याचा इशारा प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी दिला आहे.
अमळनेर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून शुक्रवारी पुन्हा ५५ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी २९ रुग्णांची अँटिजेन तर २६ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. तसेच यामध्ये १० रुग्ण हे ग्रामीण भागातील तर तब्बल ४५ रुग्ण हे शहरात आढळून आले आहेत. त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यासाठी सोमवारपासून कोविड केयर सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांनी दिली. वाढत्या रुग्णांची संख्या पाहता कोविड हेल्थ सेंटर ग्रामीण रुग्णालयात सुरू करण्यात आले आहे. दरम्यान अद्यापही नागरिक नियमांचे पालन करत नसल्याने नाईलाजास्तव जनता कर्फ्यू सारखी बंधणे लादावी लागतील. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांनी केले आहे
प्रताप महाविद्यालात होणार केंद्र
वाढत्या रुग्णांमुळे कोविड केयर सेंटर सुरू करण्याची ही आवश्यकता असल्याने उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे , तहसीलदार मिलिंद वाघ, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, संजय चौधरी , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश गोसावी, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रकाश ताळे यांनी प्रताप महाविद्यालयातील लेडीज हॉस्टेलची पाहणी केली. आणि हॉस्टेल खाली करून प्रशासनाला ताबा देण्याचे पत्र देखील महाविद्यालयीन प्रशासनाला दिले आहे. तसेच पालिका कर्मचाऱ्यांनी साफसफाई केली.