पोलिसांकडे खेटरा झिजवूनही गुन्हा दाखल न केल्याने न्यायालयात जाऊन मागितली दाद
अमळनेर (प्रतिनिधी) शेती विकणावरून पुतण्याने काकाच्या बरगड्या मोडून वारंवार त्रास दिल्यानंतरही पोलिसांनी वृद्ध व्यक्तीचा गुन्हा घेतला नाही, अखेर न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश दिले. तालुक्यातील गांधली येथील वृद्धासोबत ही घटना घडली. यामुळे पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांचा पुन्हा एक प्रताप समोर आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील गांधली येथील विठ्ठल पाटील यांनी आपल्या हिश्श्याची जमीन विक्रीसाठी काढली होती. यासाठी त्यांनी ग्राहकांना बोलावले होते. यावेळी त्यांचा पुतण्या नाना नारायण पाटील याने वाद घालून त्यांच्या पोटावर, पाठीवर, छातीवर लाथा बुक्क्यांनी मारहाण केली व मी सांगेन त्यालाच शेती विकायची अशी धमकी दिली होती. याबाबत विठ्ठल पाटील यांनी पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद देण्याचा प्रयत्न केला असता अदखलपात्र गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्यांनी खाजगी दवाखाण्यात उपचार करून फ्रॅक्चर झाल्याचा दाखला दिल्यानंतर तत्कालीन पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांनी तुमचा दिवाणी वाद आहे, तुम्ही कोर्टात जा असे सांगून गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केली. गुन्हा दाखल न झाल्यामुळे त्यांच्या पुतण्याची हिंमत वाढून तो येता जाता वृद्ध कुटुंबाला त्यांच्या अपंग मुलाला शिवीगाळ व धमकी देऊ लागला होतो. याबाबत पुन्हा ७ जानेवारी रोजी पोलिस निरीक्षकांना तक्रार करूनही त्यांनी आरोपीविरुद्ध काहीच कारवाई केली नाही. त्यानंतर पुन्हा १९ जानेवारी रोजी पुतण्याने वृद्ध काकांची गच्ची पकडून दम दिला. पुन्हा त्यांनी पोलिसांत तक्रार देण्याचा प्रयत्न करूनही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही, म्हणून अखेर वृद्धाची पत्नी कलाबाई हिने अॅड. तिलोत्तमा पाटील यांच्या मार्फत न्यायालयात दाद मागितली असताना न्या. वाय. जे. वळवी यांनी विनंती मान्य करत विद्यमान पोलिस अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.