जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आदेश
अमळनेर (प्रतिनिधी)पांझरा नदीवरील इतिहासकालीन मांडळ व मुडी या दोन फड बंधारेवरील सिंचन गेली १० ते १५ वर्षापासून बंद आहेत. त्यामुळे या बंधाऱ्यांची दुरुस्ती प्रस्ताव तात्काळ मंजुरीसाठी सादर करावे, असे आदेश जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे लवकरच या कामाला सुरुवात होईल अशी अपेक्षा आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केली असून शेतकर्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आमदार अनिल पाटील यांनी १६ डिसेंबर रोजी मांडळ येथील माजी पंचायत समिती सभापती डॉ. दीपक पाटील, एच. एल. पाटील, अरविंद सूर्यवंशी, गुणवंत पाटील, गौरव पाटील, उदय पाटील, तुषार पाटील, प्रमोद पाटील, उदय पाटील, सचिन बेहरे यांच्यासह मागणी पत्र घेऊन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली होती. यावेळी दिलेल्या पत्रात धुळे जिल्ह्यातील पांझरा नदीवरील सिंचनाची फड पध्दत ही इतिहास कालीन सिंचन व्यवस्थापनाची एक उत्कृष्ट पध्दत गेले ४०० ते ४५० वर्षापासून आहे. पांझरा नदीवरील अमळनेर मतदार संघातील सिंचन क्षेत्र असलेले मांडळ व मुडी फड बंधारे यांचे वरील सिंचन गेली १० ते १५ वर्षापासून बंद आहेत. त्यावरील सर्व बांधकाम तुटलेली आहेत. त्याचे बांधकाम नव्याने करुन बंधारा व कालवा बांधकामे करुन अत्यावश्यक आहे. त्यासाठी मांडळ फड पद्धतीच्या बंधाऱ्याला १ कोटी मुडी फड पद्धतीच्या बंधाऱ्याला १ कोटी २५ लाख रुपये अंदाजे खर्च येणार आहे. त्याचे प्रस्ताव तातडीने मंजुरीसाठी सादर करण्यासाठी संबंधीतांना आदेश व्हावेत, अशी विनंती आमदार पाटील यांनी केलेली होती. त्यावर मंत्र्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शेतकर्यांना मोठा फायदा होणार आहे.