कामात अपहार झाल्याची बळीराम पाटील यांनी बिडीओ, सीईओकडे केली तक्रार
अमळनेर (प्रतिनिधी) ग्रामपंचायतीच्या शिपायानेच वैयक्तिक शौचालयाचा कंत्राट घेऊन पूर्ण पैसे काढून अपूर्ण कामे करून स्वच्छतेच्या कामात घाण केल्याचा प्रकार तालुक्यातील धावडे येथे घडला. त्यामुळे त्याच्या विरुद्ध कारवाई करण्याची मागणी बळीराम पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी गटविकास अधिकारी तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाकडे तक्रार केली आहे.
पाटील यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संजय दयाराम पाटील हा ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून कार्यरत आहेत, असे असताना देखील त्याला वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम कंत्राट देण्यात आले. त्याला एकूण ४४ शौचालयाचे बांधकामाच्या मोबदल्यात २ लाख ६४ हजार रुपये अदा करण्यात आले आहेत. मात्र अद्यापही १४ शौचालयाचे बांधकाम अपूर्ण आहे. त्यामुळे कामात अपहार झालेला आहे. तसेच हागणदारीमुक्त योजनेतून दोन युनिटची मंजुरी घेण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करून शिपाई संजय पाटील यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.