राष्ट्रवादी युवक काँग्रेस विद्यार्थी शहर अध्यक्ष सुनिल शिंपी यांनी उपस्थित केला प्रश्न
अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी मुलाखती झाल्या असून त्यातही घराणेशाहीला झुकते माप देत वर्षानुवर्ष पक्षाचे प्रामाणिकपणाने सतरंजी उचलून पक्षाच्या संघटन वाढीसाठी झटणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्याला ठेंगा देण्याच्या हालचाली सुरू आहे.
त्यामुळे घराणेशाही की तळागाळातील कार्यकर्त्याला संधी देणार, असा प्रश्न राष्ट्रवादी युवक काँग्रेस विद्यार्थी शहर अध्यक्ष सुनिल शिंपी यांनी पत्रक काढून खबरीलालशी बोलताना उपस्थित केला आहे.
राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील जवळपास चाळीस इच्छुकांच्या मुलाखती झाल्या.
या इच्छुकांमधून कुणा एकाच्या गळ्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची माळ येत्या काही दिवसांत पडण्याची शक्यता आहे. त्यात खान्देशातून भूषण भदाणे (जळगांव), वेदांशू पाटील (जळगाव),मयूर सोनवणे (औरंगाबाद) परिक्षीत तळोलकर (नाशिक), राकेश कामळे (नागपूर), आकाश झांबरे (पुणे) व कन्हैया कुमार कदम (नांदेड) यांच्या नावांची चर्चा आहे. खरे तर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नेहमीच तळागाळातील कार्यकर्त्याला नेतृत्व करण्याची संधी देऊन मोठे केले आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्रात गावागावात आणि शहरा शहरात पोहोचली आहे. त्यात प्रदेशाध्यक्षपदासाठी तळागाळातून आलेले कार्यकर्ते ही मुलाखतीला उपस्थित होते. ज्यांच्याकडे संघटन, भाषण, नेतृत्व कौशल्य आहे. ज्यांनी पक्षासाठी जिवाचे रान केले आहे. तर काही जण घराणे शाहीतून आले आहेत. त्यांच्याकडे केवळ घराणेशाही एवढेच लेबल आहे. त्यापलीकडे कोणतेही कौशल्य नाही की पक्षासाठी भरीव अशी कामगिरी नाही. तरीही स्पर्धेत त्यांचीच नावे चर्चेत आहेत. त्यामुळे हा सर्वसामान्य आणि तळागाळातील कार्यकर्त्यावर अन्याय असल्याची भावना ही सुनिल शिंपी यांनी व्यक्त केली आहे.