जनतेचे “भूषण” असलेल्या दादांचा दबाव म्हणजे घटनेलाच फाटा देण्याचा केविलवाणा प्रकार
अमळनेर (प्रतिनिधी) येथील कोविड केअर सेंटरमधून म्हातारा गायब होऊन त्याचा तीन दिवसांनी अपघातात मृत्यू होऊन त्याचे कुटुंबीय शोकसागरात बुडाले असताना त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी एकजुट होत पुढे येणे अपेक्षित होते. मात्र यासाठी एकमेव माजी आमदार स्मिताताई वाघ यांनी महिला असूनही खंबीर भूमिका घेत याचा संबधित यंत्रणेला जाब विचारला. यामुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे अन्य आजी, माजी लोकप्रतिनिधींनीही खंबीरपणे भूमिका घेणे गरजेचे होते. मात्र ज्या अमळनेरकरांना ज्यांचे नेहमीच खरोखर “भूषण” होते, असे कृषिभूषण साहेबराव दादांनी जनतेला वाऱ्यावर सोडून अधिकाऱ्यांची बाजू घेत त्यांचे समर्थन केले आहे. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेने प्रत्येकजण चक्रावला आहे. त्यामुळे त्यांची प्रशासनावरची दादागिरीच संपली की काय, असा प्रश्न यातून उपस्थित केला जात आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर सुरुवातीपासूनच अमळनेर तालुका हा जिल्ह्यात हॉटस्पॉट राहिला आहे. तरीही येथील जनेतेने संयम राखत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या नियोजनातून कोरोनाला हरवण्याचा प्रयत्न केला आहे. अधिकाऱ्यांनीही सुरुवातीपासून चांगले काम केले आहे. म्हणूनच एकवेळ जिल्ह्यात अमळनेर पॅटर्न राबवण्याचे सल्ले दिले जात होते. त्यामुळे सर्वांनीच कोरोनाशी लढणाऱ्या अधिकाऱ्यांचे तोंडभरून कौतुक केले होते. कोरोनात काम करणारा प्रत्येक योद्धाचे योगदान हे चांगले आहे, पण त्यातही सर्वच प्रामाणिकपणे काम करीत आहेत, असेही नाही. अमळनेर प्रशासनाने सुरुवातीपासून एक नव्हे तब्बल चुकांमागून चुका केल्याने कोरोना अमळनेकरांच्या मानगुटीवर बसून आजपर्यंत थैमान घालत आहे. तरीही जनता संयमाने अधिकाऱ्यांचे आणि लोकप्रतिनिधींचे कौतुक करताना थकत नाही, आहो तालुक्यात एक नव्हे दोन नव्हे तब्बल ३१ जणांचा बळी कोरोनाने आतापर्यंत घेतला आहे. तरही जनता यंत्रणेविरुद्ध ब्र शब्द बोलत नाही. म्हणून अधिकारी आणि लोकप्रतिनिधी आपली पाठ थोपटून स्वतःला शाब्बास म्हणत स्वताचे कौतुक करून घेत स्वतःला कोरोना योद्धा म्हणत आहे. आणि कोरोना जनतेच्या जीवावर उठला आहे, हे अजूनही यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी गांधारीसारखे डोळ्यावर पट्टीबांधून सर्व अलबेल असल्याचे भासवत आहे.
जाब विचारणे म्हणजे गुन्हा आहे काय..?
कोविड सेंटर मधून एक वयोवृद्ध बेपत्ता होतो, त्यानंतर ३ दिवसांनी त्याचा मृतदेह सापडतो ? याबाबत एक ही शब्द प्रशासनला कोणी विचारू नये ? आणि ज्या महिलेने तो विचारण्याची हिम्मत दाखवली तिच्या हिमतीला दाद देण्याऐवजी अधिकाऱ्यांना समर्थन देणे योग्य आहे का, असे एक ना अनेक प्रश्न जनता विचारू लागली आहे, म्हणूनच माजी आमदार साहेबराव दादा यांनी सर्वसामान्य वृद्धाच्या कुटुंबांना न्याय मिळून देण्याऐवजी अधिकाऱ्यांना समर्थ देऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे निवेदन दिले आहे. त्यामुळे साहेबराव दादांना या उलट्या भूमिकेतून काय सुलटे करून घ्यायचे आहे, दोषींवर कारवाई करायची नाही, मग नागरिकांना मरू द्यायचे काय, ही घटना अधिकाऱ्यांनी अंगावर घ्यायचे काम नाही, चुक ही चूक आहे. चौकशीत जे दोषी आढळतील. त्यांच्यावर कारवाई होइलच, पण कारवाईच होऊ नये म्हणून अधिकाऱ्यांच्या संघटना आणि लोकप्रतिनिधींचा दबाव आणून घटनेलाच फाटा देण्याचा केविलवाणा प्रकार सुरू आहे. यात सर्वांवरच कारवाई होणार नाही, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, मग अधिकारी का घाबरताय, ज्या अधिकाऱ्यांचे खरच चांगले काम असेल तर त्यांना सॅल्युट आहे. जर कोणी चुकत असेल तर त्यांच्यावर कारवाईसाठी जाब विचारला जात असेल, तर तो गुन्हा आहे का, असा प्रश्न आता जनतेतून उपस्थित होऊ लागला आहे.
व्हॉट ईज धीस.. दादा.. ?
साहेबराव दादांची अधिकाऱ्यांवर चांगली पकड होती, म्हणून राजभवनातील या राजाकडून सर्वसमान्य मानसाला न्यायाची अपेक्षा असायची. पण या प्रकरणात सारे उलटे घडत आहे. अधिकारी हे राजकारण्यांचा पाठींबा घेण्यासाठी लॉबिंग करीत आहे. म्हणूच माजी आमदार साहेबराव दादा पुढे आले. “खर तर दादा, ज्याना घरमा कोरोना व्हयल शे त्याले विचारा, काय परिस्थिती राहस, दादा तुम्ही दर पाच वर्षांनी मतांचा जोगवा मागताना जनतेच्या दरबारी येतात, आणि आता जनेतला वाऱ्यावर सोडत अधिकाऱ्यांची बाजू घेताय, तेव्हा ते येणाऱ्या काळात निश्चितच तुम्हाला जाब विचारतील. म्हणून घडलेल्या घटनेवर पांघरून घालून कोणावरच कारवाई होऊ नये, ही भूमिका कितपय योग्य आहे, याचा विचार करावा. यातून दादा हे अधिकाऱ्यांच्या चुका झाकत आहे. खरेतर अधिकारी तीन वर्षच राहतात. ज्यां अमळनेरकरांनी तुम्हाला डोक्यावर घेतले त्यांनाच तुम्ही अधिकाऱ्यांसाठी वाऱ्यावर सोडले आहेत. नगरपालिका तुमच्या ताब्यात असल्याने तुमचे अधिकारी अडचणीत येतील म्हणून पत्नीच्या नगराध्यक्षपदाच्या आड लुडबुड करीत तुम्ही बेटचेपी भूमिका घेतली असेल तर जनता आता आपल्याला भर चौकात “व्हॉट ईज धीस..” दादा, असे म्हटल्याशिवाय राहणार नाही.