आपल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मुलीवरही उपचार करून गरीब कुटुंबासाठी ठरले “विघ्नहर्ता”
अमळनेर (प्रतिनिधी) प्रसूतीसाठी पुरेसे पैसे नसतानाही सामाजिक बांधिलकी जपून मजुरी करणार्या महिलेची प्रस्तुती करून तिने जन्म दिलेल्या मुलीच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलून अमळनेरातील डॉ. चव्हाण बंधूंनी “बेटी बचाव”चा संदेश देत आपल्यातील डॉक्टरचे खऱ्या अर्थाने देवत्व सिद्ध केले. तर या डॉ. चव्हाण बंधूंनी आपल्या विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखवलेल्या माणुसकीने मजुरी करणार्या कुटुंबांवरील विघ्न खऱ्या अर्थाने टाळले.
अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील भिल्ल समाजातील मिराबाई किसन भिल या महिलेला सातव्या महिन्याच्या जवळपास प्रसृती कळा सुरू झाल्याने दि.१५ मार्च रोजी रूग्णालयात दाखल होण्यासाठी अमळनेर येथे नातेवाईकांसह आली. पण महिलेची परिस्थिती पहाता काही डॉक्टरांनी दाखल करण्यास नकार दिला. अशातच नातेवाईकांनी या महिलेस डॉ.मनिष चव्हाण व डॉ.महेंद्र चव्हाण यांच्या विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अमळनेर मध्ये नेले असता परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी या महिलेस दाखल करून घेतले.
पैशाची चिंता करू नका आई व बाळ दोघांना वाचवण्याचा डॉक्टरांनी दिला मोठा दिलासा
रूग्णाची आर्थिक परिस्थिती कमकुवत होती. मजूरी करून प्रपंच करणार्या या परिवाराकडे उपचारासाठी पुरेसे पैसे नव्हते. अशावेळी डॉ.महेंद्र चव्हाण यांनी या कुटूंबाला धीर दिला. पैशाची चिंता करू नका आपण आई व बाळ दोघांना वाचवण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वस्त केले. गरोदरपणात आई व बाळाचे व्यवस्थित पोषण झालेले नसल्याने परिस्थिती बिकट होती.आईचे हिमोग्लोबीन कमी होते. विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे स्त्री रोग व प्रसृती शास्त्र तज्ञ डॉ.महेंद्र चव्हाण यांनी ही जोखीम स्विकारत महिलेची सुखरूप प्रसृती केली. या महिलेस मुलगी झाली. मुलींचे जन्मतः वजन अत्यंत कमी म्हणजे फक्त ११०० ग्रॅम इतकेच होते.
बालरोग तज्ञ डॉ.मनिष चव्हाण यांनी मुलीला वाचविण्यासाठी केले शर्थीचे प्रयत्न
बाळ वाचेल की नाही याची चिंता परिवारास व डॉक्टरांना वाटू लागली. त्यांनी त्यांचे बंधू व बालरोग तज्ञ डॉ.मनिष चव्हाण यांच्या देखरेखीखाली बाळास रूग्णालयात दाखल केले. आता ५-६ दिवसानंतर आई व बाळाची तब्येत सुधारत असुन बाळाच्या वजनात वाढ होत आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत रूग्णाचे व नवजात बाळाचे प्राण वाचवून आपल्या कृतीतून डॉ.चव्हाण बंधूंनी मुलगी वाचवा हा संदेश दिला आहे.डॉ.चव्हाण बंधूंनी जोपासलेल्या या बांधिलकी बद्दल सदर कुटुंबाने व मंगरूळ गावाच्या ग्रामस्थांनी त्यांना धन्यवाद देऊन आभार प्रकट केले आहेत.