अमळनेरातील पशुखाद्य विक्रेत्या दुकानदारांनी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने आणि प्रशासनाने केवळ जीवनाश्यक वस्तूंची दुकानेच उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यामुळे गाई, म्हशी असणाऱ्या शेतकऱ्यांना ढेप आणि पशुखाद्य मिळण्याची अडचण होत असल्याने ही दुकाने सुरू ठेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी अमळनेर येथील पशुखाद्य विक्रेत्यांनी अमळनेर विभागाच्या प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अमळनेर शहरातील विनोद ट्रेडिंग, राज ट्रेडिंग, श्याम ट्रेडिंग, छजेड ट्रेडिंग, लक्ष्मीनारायण ट्रेडिंग, कोमल ट्रेडिंग, बालाजी ट्रेडिंग आदींच्या दुकानांच्या संचालकांनी प्रांताधिकारी सीमा अहिरे यांना निवेदन दिले आहे. तसेच प्रांतांशी झालेल्या चर्चेत त्यांना यावर सकारात्मक निर्णय घेण्याबाबत सांगितले. मात्र दुकानावर पाच पेक्षा अधिक लोक दिसल्यास कठोर पावले उचलण्याचाही इशारा दिला. दरम्यान यासंदर्भात पशुखाद्य विक्रेत्यांनी माहिती देताना सांगितले की, देशात आलेल्या बिकट परिस्थितीची जाणीव आम्हाला असून अश्या गंभीर परिस्थितीत आम्हीही दुकाने न उघडण्याच्या मनस्थितीत आहोत. परंतु तालुक्यातील शेतकरी बांधव ज्यांच्याकडे गाई व म्हशी आहेत ते पशुधन उपाशी मरू नये या चिंतेत आहे. प्रत्यक्षात अत्यावश्यक सेवेत दुधाचा समावेश असून ते दूध म्हशी आणि गाई कडूनच मिळणार आहे. यामुळे या पशुधनास खाद्य पुरवणे देखील गरजेचे आहे. यामुळे संबंधित पशुपालक कोणत्याही परिस्थितीत पशुखाद्य आणि ढेप उपलब्ध करण्याचा आग्रह आमच्याकडे धरीत आहेत. दुसरीकडे आम्ही दुकाने उघडी ठेवली असल्यास पोलिसांच्या रोशास आम्हाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे प्रांतधिकारी यांनीच यांनी आम्हाला वेळ ठरवून देऊन मार्ग काढावा दुकानात गर्दी होणार नाही याची जवाबदारी आमची राहील, अशी ग्वाही या विक्रेत्यांनी केली आहे. दरम्यान प्रशासनाने देखील ही परिस्थिती लक्षात घेता पशु खाद्य दुकानांना अत्यावश्यक सेवेत घेणे आवश्यक आहे, अशी मागणी केली.