अमळनेर (प्रतिनिधी )सार्वजनिक गावठाण जागेवर अतिक्रमण एकलहरे येथील सरपंचाला चांगलेच भोवले. याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशाने सरपंचाला अपात्र करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी यांनी सरपंच मीनाबाई पाटील यांना अपात्र केले आहे व निवडणुकीचे आदेश दिले आहेत.
एकलहरे येथील सरपंच मिनाबाई फत्तेलाल पाटील यांनी सर्वजनिक गावठाण गट क्रमांक २७५/१व २ जागेवर अतिक्रमण केले होते. याबाबत डी. एम. पाटील यांनी अॅड. विश्वासराव भोसले व अॅड. दिनेश पाटील यांनी १६ मार्च २०१७ रोजी सरपंच अपात्र करण्याबाबत ग्रामपंचायत विवाद अर्ज दाखल केला होता. अतिक्रमण सिद्ध झाल्याने जिल्हाधिकारींनी त्यांना अपात्र केले होते. त्यावर मिनाबाई पाटील यांनी नाशिक विभागीय आयुक्त यांच्याकडे अपील दाखल केले होते. आयुक्तांनी १ जानेवारी २०१८ रोजी अपील फेटाळून अपात्रतेचा निकाल कायम केला होता .त्यानंतर सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली होती. त्यावर सरपंच मिनाबाई पाटील यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अॅड. एस. के. तांबे यांनी काम पाहिले. तर न्यायालयाने विशेष मदतनीस म्हणून अँड. आर. एस. देशमुख याना बोलावले होते तक्रारदरातर्फे अॅड. प्रकाशसिंग पाटील यांनी काम पाहिले अखेर दोन्ही कडचा युक्तिवाद ऐकून न्या. आर. जी. अवचट यांनी सरपंचांना अपात्र घोषित केले.