अमळनेर (प्रतिनिधी) पोटासाठी हातमजुरी करून जीवन जगणाऱ्या गोरगरीब जनतेच्या २ रुपये किलोच्या धान्यावर डल्ला मारून आपला गल्ला भरण्याचा गोरखधंदा अमळनेर शहरासह तालुक्यातील रेशनदुकानदारांचा सुरू आहे. यात तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचेही हात ओले होत असल्याने राजरोसपणे गरीबांच्या धान्यावर बिनधास्तपणे हा दारोडा टाकला जात आहे.
गरीब व गरजू लोकांना त्यांची भूक भागविता यावी त्यांना प्रतिष्ठेचे जीवन जगण्यासाठी सवलतीच्या दराने हक्काचे धान्य मिळावे यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा केंद्र शासनाने संमत केला आहे. सध्या स्थितीत अमळनेर शहरासह तालुक्यात सुमारे १८४ रेशनची दुकाने आहे. या सर्वच दुकानांवर अधिकप्रमाणात अनियमितता आहे. या रेशन वितरणप्रणातील भ्रष्ट्राचार नष्ट करण्यासाठी पॉश मशीनचा वापर करण्यात येत आहे. मात्र भ्रष्टाचार करण्याची सवय झाल्याने यातूनही या रेशनतस्करांनी मार्ग शोधून काढला आहे. यासाठी त्यांना तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचीही मोठी मदत होत आहे. म्हणून या रेशनिंगमधील भ्रष्ट्राचाराची साखळी तोडण्यासाठी तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
गोररगरीब जनतेचे असे उडवले जाते धान्य
अंत्योदय कार्डधारकांना प्रती कुटुंब प्रती महिना ३५ किलो धान्य वितरीत करण्यात येते. तर इतर (प्राधान्य) शिधापत्रिका धारकाला ५ किलो धान्य प्रत्येक महिन्याला कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीनुसार देण्यात येते. या दोन्ही प्रकारात देण्यात येणाऱ्या धान्याचा दर हा गहू २ रुये प्रती किलो, तांदुळ ३ रुपेय प्रती किलो तर भरडधान्य रुपये १ प्रती किलो या दराने वितरण करण्यात येते. मात्र बहुतांश रेशनदुकानदार हे या कुटुंबाचे “थम्ब” घेऊन एक ते दोन दिवासत माल येईल, कोणालाही पाठवून द्या, असे सांगतात. त्यांनतर घरातील दुसरा आला की त्याचेही “थंब” घेतात. मागील महिन्याचा माल पुढील महिन्यात, तर कधी मालच देत नाही. हा माल ते ब्लॅकमध्ये किंवा अन्य कार्डधारकाला चालवुन त्यातून पैसे कमवतात.
एकाच दुकानदाराला अन्य दुकाने जोडण्याचा हट्टाहास का…?
अनेकदा काही दुकानदारांचे परवाने तहसील कार्यालयाकडून निलंबीत केले जातात. मात्र त्याचा परिणाम हा त्या दुकानदाराच्या कार्डधारकांवर होतो. म्हणून या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून ते अन्य दुकानदाराला जोडेले जाते. परंतु यातही मोठी शाळा केली जात आहे. त्यात निलंबीत दुकानाच्या कार्डधारकांना रेशनसाखळीत मुजोरांनाच जोडले जातात. कारण यातून धान्याचे नियतन वाढून मोठ्याप्रमाणार हपाहपाचा माल गपागपा करायाला मिळतो. अनेकदा हे दुकान लांब असल्याने बहुतांश जण धान्य घेण्यासाठी जात नाही. मुदतीनंतर त्यांच्या मालाची रितसर विल्हेवाट लावून हे रेशनदुकानदार गब्बर होत आहे. त्यामुळे एकापेक्षा अधिक दुकाने जोडलेल्या रेशनदुकानदरांकडून ती काढून घेण्याचीही कारवाई तहसीलदारांनी केली तर यातून बरेच मोठे घबाड समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या दृष्टीने पावले उचलण्याची गरज आहे.