अमळनेर (प्रतिनिधी) निराधार व्यक्तिंना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आमदार अनिल पाटील यांनी मदतकेंद्र सुरू केले आहे. या मदत केंद्रातून विविध योजनांची माहिती देऊन लाभ मिळवून दिला जात आहे. त्यात आतापर्यंत 167 वृद्धापकाळ व विधवांचे प्रकरणे मंजूर झाले आहेत.
अमळनेर विधानसभा मतदार संघातील निराधार वृद्ध महिलांना संजय गांधी, श्रावण बाळ व इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेचा लाभ मिळवण्यासाठी होणारा शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास वाचवून मदत केंद्र सुरू करून स्वखर्चाने एक व्यक्ती नेमून आदिवासी महिलांना लाभ मिळवून दिला आहे.
निराधार महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अनेक वेळा हेलपाट्या माराव्या लागतात. तसेच अज्ञानी असल्यामुळे व कर्मचाऱ्यांच्या उडवाउडवीची उत्तरांमुळे वृद्ध महिलांना पुन्हा पुन्हा येण्याचा शारीरिकव मानसिक त्रास होतो आणि दलालांमुळे आर्थिक झळ पोहचते. म्हणून आमदार अनिल पाटील यांनी राष्ट्रवादी कार्यालयात मदत केंद्र सुरू करून तेथून त्या व्यक्तींना मदत व मार्गदर्शन मिळणार आहे. अनेक महिलांना एकाच ठिकाणी कागदपत्रे व माहिती दिल्याने त्यांचा त्रास वाचून त्यांना लाभ मिळवुन दिला जाणार आहे. नुकतेच १६७ वृद्धापकाळ व महिला पुरुष व विधवा महिला यांना लाभ मिळवून देण्यात आला आहे.