अमळनेर (प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर बाहेरच्या जिल्ह्यातील लोकांनी मतदार संघात थांबू नये, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा प्रातांधिकाऱ्यांनी दिला आहे. मात्र या निवडणुकीच्या रिंगणात बाहेरील जिल्ह्यातून अनेक जण मतदार संघात छुप्या पद्धतीने फिरून मतदारांना प्रभाव टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे असाच प्रकार नगरपालिका निवडणुकीत झाला होता. त्यावेळी एमएच ३९ क्रमांकाच्या गाड्या फोडण्याचा प्रकार झाला होता. तोच विधानसभा निवडणुकीत होऊ नये, यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी व पोलिस प्रशासनाने डोळ्यात तेल घालून अशा प्रकारावर लक्ष ठेवावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रसचे शहर अध्यक्ष विश्वास (बाळु) पाटील यांनी केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अमळनेर मतदार संघात बाहेरगावाहून आलेले लोकांनी प्रचाराची मुदत संपताच गाव सोडायचे आहे. त्यामुळे अशी काही लोक मतदारांवर प्रभाव टाकताना आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. याच मुद्द्याच्या अनुषंगाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. की, प्रचारासाठी बाहेरील जिल्ह्यातून अनेकजण आले आहेत. ते प्रचार संपला तरी जात नाहीत. तसेच मतदार संघात फिरून मतदारांना वेगवेगळी आमिषे देतात आणि दमदाटी करतात. नगरपालिकेच्या निवडणुकीतही असाच प्रकार घडला होता. त्यामुळे नंदुरबारच्या एमएच ३९ क्रमांकाच्या गाड्या फोडण्याचा प्रकार घडला होता. यामुळे तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सर्वसामान्य नागरिक वेठीस धरला गेला होता. तोच प्रकार गेल्या विधानसभा निवडणुकीत झाला होता. मागील निवडणुकीत ८० लाख रुपये सापडले होते. ही उदाहरणे ताजी असल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदार संघात बारीक लक्ष ठेवून बाहेरील जिल्ह्याहून आलेल्या प्रमुख पाहुण्यांना पाहुणचार खाऊ घालून सन्माने त्यांच्या गावी पाठवावे, म्हणजे अमळनेर मतदार संघातील कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही आणि शांतता राखली जाईल.
यह शहर है अमन का, यहां पर सब शांति शांति…
सानेगुरुजींच्या कर्मभूमिने आणि संत सखाराम महाराज यांच्या पुण्यभूमिने अमळनेर शहर नेहमी शांत आहे. मात्र गेल्या पाच वर्षांत गलीच्छ राजकारनाने या शहाराची शांतता बिघडवली आहे. या सर्व प्रकारात मात्र सर्वसामान्य मानूस भरडला जात आहे. या विधानसभा निवडणुकीतही कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रशासनाने सतर्क रहावे, अशी मागणी राष्ट्रवादी कडून करण्यात येत आहे.